पुणे : राज्यातील अनेक शहराचे तापमान ४० अंश सेल्सियसवर गेले होते. त्यातून सोमवारी थोडा दिलासा मिळाला आहे. परंतु पुन्हा अवकाळी पावसाचे संकट आहे. मार्च महिन्यानंतर आता संपूर्ण एप्रिल महिना अवकाळी पावसाचा झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुणे वेधशाळेने राज्यातील पुढील तीन- चार दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात २५ ते २८ एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट
राज्यात २५ एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात विजांच्या गडगडाटासह पाऊस पडणार आहे. कोकण अन् गोव्यात २५ रोजी हवामान कोरडे राहणार आहे. त्यानंतर २६ ते २८ दरम्यान काही ठिकाणी जोरदार विजांचा कडकडाट मेघगर्जना व गारपीट होण्याची शक्यताही वर्तविली असून जोराचे वादळ देखील येवू शकते. हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. २७ आणि २८ रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात येलो अलर्ट आहे. पुणे शहर व जिल्ह्यात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
तापमान वाढीतून किंचित दिलासा
राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद जळगावात झाली आहे . जळगावमध्ये सर्वाधिक ३९ अंश तापमान नोंदवले गेले होते. जळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा, नागपूर, धाराशिव, परभणी, नांदेड, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ किंवा राज्यातील शहरांमध्ये तापमानात वाढ आहे.
मुंबईकरांना दिलासा
राज्यातील अनेक शहराचे तापमान ४० अंश सेल्सियसच्या जवळपास असताना मुंबईकरांना दिलासा मिळाला. मुंबईचे तापमान ३२ अंशावर होते. पुणे शहराचे तापमान ३६.१ अंशावर होते.
शहर तापमान
जळगाव 39, अकोला 38.3, मुंबई 32, पुणे 36.1
नागपूर 35.3, नाशिक 36, चंद्रपूर 38.2
चंद्रपूरला वादळी पावसाचा शाळेला फटका
चंद्रपूरच्या गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या चेकदरुर येथील इंदिरा गांधी हायस्कूल वादळी वाऱ्याने उडून गेले. योगायोगाने शाळेत कुणी हजर नसल्याने मोठी हानी टळली. मागील चार दिवसापासून जिल्ह्यात विचित्र वातावरण सुरू आहे. दिवसभर लाहीलाही करणारी ऊन अन पाच वाजता नंतर वादळी पाऊस जिल्ह्यात बघायला मिळत आहे. या विचित्र वातावरणाचा फटका जिल्हा वासियांना बसत आहे. वादळी पावसाने या चार दिवसात अनेक घरांची पडझड झालेली आहे.
नाशिकला ऑरेंज अलर्ट
नाशिकला पुढचे चार दिवस पुन्हा धोक्याचे आहे. नाशिक जिल्ह्याला उद्यापासून पुन्हा ऑरेंज अलर्ट दिला आहे. नाशिकला बेमोअमी पावसाचा पुन्हा फटका बसण्याची शक्यता आहे. यापूर्वीच जिल्ह्यातील हजारो हेकटर पिकांचे अवकाळीमुळे नुकसान झाले आहे.