पंतप्रधान नरेंद्र मोदींची सतत कामं, दौरे करत राहण्याची सवय सर्वश्रूत आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या त्यांच्या दौऱ्यामध्ये ते केवळ ३६ तासांमध्ये आठ कार्यक्रमांना उपस्थित राहणार असून तब्बल ५,३०० किलोमीटर प्रवास करतील. यामध्ये ते शहरांचे दौऱे करणार आहेत.

अनेक विकास प्रकल्पांचा शुभारंभ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सात शहरांमधून ५,३०० किलोमीटरहून अधिक प्रवास करतील आणि सोमवारपासून ३६ तासांत आठ कार्यक्रमांना उपस्थित राहतील. मंगळवारी राजधानी दिल्लीत परतण्यापूर्वी पंतप्रधान मोदी दिल्ली ते मध्य प्रदेश, त्यानंतर दक्षिणेकडील केरळ, त्यानंतर दादरा आणि नगर हवेली आणि पश्चिमेला दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशात जातील, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. पंतप्रधान दिल्ली ते खजुराहो असा प्रवास करतील, सुमारे ५०० किलोमीटर अंतर पार करतील आणि त्यानंतर राष्ट्रीय पंचायती राज दिन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रीवा इथं जातील. यानंतर, ते खजुराहो इथं परत येतील, तिथून १७०० किलोमीटर अंतर पार करून कोचीला जातील.

अधिक वाचा  राज्यात दोन भीषण अपघात, सात जणांचा मृत्यू, बस अन् ट्रकची समोरासमोर धडक

मंगळवारी सकाळी पंतप्रधान मोदी कोची ते तिरुअनंतपुरम असा सुमारे १९० किमीचा प्रवास करतील. तिथे वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील आणि विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करतील. पुढे पंतप्रधान सुरतमार्गे सिल्वासाला जातील. यात सुमारे १५७० किलोमीटरचा प्रवास करतील. सिल्वासा इथं पंतप्रधान मोदी नमो मेडिकल कॉलेजला भेट देतील आणि विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करतील.