आयपीएलमध्ये सध्या अटीतटीच्या सामन्यांमुळे वातावरण तापलं असतानाच खेळाडू आमने-सामने येत असल्याने मैदानात वादावादी होतानाही दिसत आहे. सर्व संघ एकमेकांना कडवी झुंज देत असताना मैदानात कट्टर प्रतिस्पर्ध्याप्रमाणे वागत आहेत.नुकतंच दिल्ली आणि बंगळुरुमध्ये झालेल्या सामन्यात विराट कोहली आणि सौरव गांगुली आमने-सामने आल्यानंतर असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं होतं. ए चिन्नास्वामी मैदानावर झालेल्या या सामन्यात या दोन दिग्गजांमधील मतभेद जाहीरपणे समोर आले होते. सामना संपल्यानंतर दोन्ही खेळाडू एकमेकांना टाळण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. गांगुलीने तर विराटशी हस्तांदोलन करणंही टाळलं. यानंतर दोघांचे व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते. यादरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी यावर भाष्य केलं आहे.
दिल्ली आणि बंगळुरुमधील सामन्यानंतर विराट कोहली आणि सौरव गांगुलीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. क्रिकेट चाहत्यांमध्ये या व्हिडीओची जोरदार चर्चा रंगली होती. दरम्यान या सामन्यानंतर विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर सौरव गांगुलीला अनफॉलो केलं, तर गांगुलीनेही तसंच केलं. दोघांमध्ये वाढत चालेल्या या तणावावर रवी शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रवी शास्त्री यांनी ESPN Cricinfo ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “माझं नातं काय आहे यावर अवलंबून आहे. जर मला चर्चा करायची नसेल. तर मी जाऊ देईन. पण जेव्हा तुम्ही त्याच्या खोलात जाता आणि बसून विचार करता तेव्हा तुम्हाला पुढे जाण्यासाठी नेहमी थोडी जागा आहे असं वाटतं. मग तुमचं वय कितीही असो”.
विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि सौरव गांगुली बीसीसीआय अध्यक्ष असताना दोघांमध्ये तणाव निर्माण झाल्याचं बोललं जातं. 2021 मध्ये विराट कोहलीने टी-20 चं कर्णधारपद सोडल्यानंतर या वादाला सुरुवात झाली होती. दोन महिन्यांनी विराट कोहलीला वन-डेच्या कर्णधारपदावरुनही हटवण्यात आलं होतं. यानंतर रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं होतं.
जानेवारी 2022 मध्ये विराट कोहलीने भारतीय कसोटी संघाचं कर्णधारपदही सोडलं. यानंतर रोहित शर्मा तिन्ही प्रकारांत कर्णधार झाला होता. काही रिपोर्ट्सनुसार, सौरव गांगुलीच्या नेतृत्तातील बीसीसीआयने विराट कोहलीला एकदिवसीय संघाचं कर्णधारपद सोडायला लावलं होतं. विराट कोहलीने पत्रकार परिषदेतही बीसीसआयवर गंभीर आरोप केले होते, ज्यामुळे एकच खळबळ माजली होती.